X : @nalavadeanant
मुंबई: महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दोन जागांवर अजून निर्णय झालेला नसून त्यावर चर्चेतून लवकरच मार्ग निघेल. मात्र आघाडीचा धर्म सर्वांनीच पाळला पाहिजे. सांगली व भिवंडी या काँग्रेसच्या परंपरागत जागा असून या जागांवर पक्षाकडे चांगले उमेदवारही आहेत. परंतु, सांगलीत जे झाले ते बरोबर झाले नाही, अशा कानपिचक्या देत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या प्रस्तावासाठी काँग्रेसने एक पाऊल पुढे टाकले असून आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या मित्र पक्षांनीही तो प्रस्ताव मान्य करावा, असे आवाहन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मंगळवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले.
पटोले म्हणाले की, देशाचे संविधान व लोकशाही टिकवणे हे सर्वांचे काम आहे. आताची निवडणूक ही देश वाचवण्यासाठीची असून भाजपाचा पराभव करणे हाच सर्वांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनीच वैयक्तिक हेवेदावे सोडले तर महाविकास आघाडी या लोकसभा निवडणुकीत भाजपाचा नक्कीच दारूण पराभव करेल. मागील १० वर्षात भाजपाने खोटी आश्वासने देऊन देशाला बरबाद केले आणि त्याचा उगम हा नागपुरच आहे. महागाई, बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे, शेतकऱ्याला उद्ध्वस्त केले आहे. देशावर कर्जाचा मोठा डोंगर करून ठेवला आहे. त्यामुळे जनतेमध्ये मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष असून त्यामुळेच मोदी सरकारला धडा शिकवल्याशिवाय जनता गप्प बसणार नाही असे चित्र सगळीकडे असल्याचे पटोले यांनी नमूद केले.
नागपूरमध्ये भाजपाचा उमेदवार कोण आहे हे महत्वाचे नाही. कारण ही लढाई विचाराची आहे. हायवे मॅन चित्रपट फ्लॉप झाला, मोदींवर काढलेला चित्रपटही फ्लॉप झाला. पण मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपट मात्र सुपरहिट झाला होता. कारण आज जनतेला गांधी विचाराची आवश्यकता असून विकासाच्या नावाखाली नागपूरचे बेहाल करुन ठेवले आहेत. मग नेमका कोणाचा विकास झाला? कुठे गेले मिहान? मालवाहतुक करणारी विमाने उतरतील आणि शेतकऱ्यांना फायदा होईल, या आश्वासनांचे काय झाले. नागपूर शहरात सिमेंटचे रस्ते बनवले आहेत, आधीच नागपुरात जास्त तपमान व आता सीमेंटचे रस्ते यामुळे तापमान आणखी वाढणारच. स्थानिक मुद्द्यांबरोबरच राष्ट्रीय मुदद्यांवरही या निवडणुकीत भर दिला जाणार आहे. पक्षात एकजूट असून नागपूरमधून काँग्रेस व महाविकास आघाडीचा उमेदवार तब्बल अडीच लाख मताधिक्क्याने विजयी होईल, असा विश्वासही पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.