मुंबई: दक्षिण मुंबईसह बेस्ट उपक्रमाच्या कार्यक्षेत्रात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्याच्या तक्रारींची विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कडक इशारा दिला. या प्रश्नावर तोडगा निघाला नाही, तर बेस्टचे महाव्यवस्थापकांना थेट विधानसभेत बोलावून जाब विचारला जाईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
विधानसभेत लक्षवेधी सूचनेवर झालेल्या चर्चेदरम्यान अध्यक्ष नार्वेकर म्हणाले की, बुधवारी आपल्या दालनात बेस्ट महाव्यवस्थापक, मुंबई महानगरपालिका आयुक्त, नगरविकास मंत्री आणि संबंधित आमदारांची संयुक्त बैठक बोलावण्यात येणार आहे. या बैठकीत नागरिकांच्या वीजपुरवठ्याशी संबंधित समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल.
काँग्रेसचे आमदार अमिन पटेल यांनी दक्षिण मुंबईतील नागरिकांना दररोज १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित होत असल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी या प्रश्नावर तातडीने तोडगा निघाला नाही, तर विधानभवनाच्या पायऱ्यांवर अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशाराही दिला.
लक्षवेधी सूचना प्रथम आमदार तमिळ सेल्वन यांनी मांडली. त्यानंतर दक्षिण मुंबईतील सदस्यांनीही या प्रश्नाची तीव्रता अधोरेखित केली.
उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी अनेक ठिकाणी डीपींवर अतिरिक्त भार येत असल्याने वीजपुरवठा खंडित होत असल्याचे सांगितले. भूमिगत वीज केबल्सची दुरुस्ती, नवीन सबस्टेशन उभारणी तसेच ग्राहकांसाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभारण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्यमंत्री मिसाळ यांनी ऊर्जा विभागानेही या विषयावर उत्तर द्यावे, अशी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा विषय नगरविकास विभागाच्या कार्यक्षेत्रातील असल्याचे स्पष्ट करत तो मुद्दा अमान्य केला.
चर्चेच्या अखेरीस अध्यक्ष नार्वेकर यांनी संबंधित यंत्रणेला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश देत, नागरिकांना वारंवार होणाऱ्या वीजपुरवठा खंडित होण्यापासून दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त केली.

