ताज्या बातम्या महाराष्ट्र

इंडिया आघाडीच्या बैठकीतून ‘भाजप चलो जाव’ चा नारा

Twitter : @NalavadeAnant

मुंबई

भाजपच्या अत्याचारी सरकारविरोधात देशभरातील विविध राजकीय पक्षांनी इंडिया आघाडीच्या नावाखाली वज्रमुठ बांधलेली असून इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट आणि १ सप्टेंबर अशी दोन दिवस होणार आहे. ३१ ऑगस्टला इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरणही केले जाईल. महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सत्तेला मुंबईतूनच ‘चलो जाव’ चा नारा दिला होता. त्यानुसार मोदी सरकारला सुद्धा मुंबईतील बैठकीतूनच ‘चले जाव’ चा नारा दिला जाईल, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.

विरोधी पक्षाच्या इंडिया आघाडीची बैठक येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी होत आहे. या पार्श्वभूमीवर पटोले म्हणाले की, मुंबईत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला आगळंवेगळं महत्व आहे. एनडीएमधील काही पक्षही इंडिया आघाडीत सहभागी होऊ शकतात. या बैठकीला नितिशकुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल यांच्यासह ६ मुख्यमंत्री, विविध पक्षांचे अध्यक्ष, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी उपस्थित असतील. इंडिया आघाडीमध्ये पंतप्रधानपदासाठी अनेक सक्षम उमेदवार आहेत. परंतू भाजपकडेच या पदासाठी उमेदवार नाही. नरेंद्र मोदींना जनता आता कंटाळली आहे, त्यांची लोकप्रियता झपाट्याने घसरत आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल यावर आघाडी निर्णय घेईल. पण काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत, ही आमची भावना आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांच्याबरोबर काही सहकारी भाजपशी हातमिळवणी करून सत्तेत सहभागी झाले ते ईडीच्या धाकाने, विकासासाठी नाही, हे शरद पवार यांनीच स्पष्ट केले आहे. हेच लोक मागील अनेक वर्षांपासून सत्तेत होते. मग त्यांनी काय विकास केला ते सांगावे, अशी विचारणाही पटोले यांनी केली.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जवळपास १७ वर्षांपासून सुरु आहे. मात्र हा रस्ता पूर्ण होत नाही. या रस्त्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. भाजपचे लोकच या रस्त्याच्या कंत्राटात भागिदार आहेत. कमिशनच्या वादातून हा रस्ता पूर्ण होत नाही. अनेक कंत्राटदार काम सोडून पळून गेले आणि त्याचा फटका मात्र कोकणच्या लोकांना बसत आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीकडून मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची चौकशी करावी, अशीही मागणी पटोले यांनी केली.

‘शासन आपल्या दारी’ अभियानावर जनतेच्या पैशाची लूट चालली असून काँग्रेस सरकारच्या काळातील योजनाच हे सरकार राबवत आहे आणि त्याचे श्रेय मात्र स्वतः लाटत आहे. ज्याठिकाणी हा कार्यक्रम होतो, तिथली जनता सरकारबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत असल्याचा दावाही पटोले यांनी केला.

Anant Nalavade

Anant Nalavade

About Author

अनंत नलावडे (Anant Nalavade) हे राजकीय पत्रकार असून गेले तीन दशक ते मंत्रालय आणि विधिमंडळ कवर करत आहेत.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात