मुंबई : लोकसभेच्या निवडणुकीनंतर आता राज्यात विधानसभेचे( Vidhana Sabha)वारे वाहू लागले आहे , मात्र त्याआधी महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 सदस्यांचा कार्यकाल 27 जुलै रोजी संपत असल्याकारणानं, या जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक (Vidhanparishad) जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकांसाठी भाजपकडून 11 नावांची चर्चा सुरू असून यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना राज्यसभा किंवा विधान परिषदेवर पाठवण्याची तयारी होत आहे. विशेष म्हणजे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवल्यास त्यांना राज्यात मंत्रीपद मिळण्याची देखील शक्यता आहे.
विधानपरिषदेच्या 4 जागांसाठी नुकतीच निवडणूक पार पडली असून पुढील महिन्यात विधानपरिषदेच्या 11 जागांसाठीही निवडणूक होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून विधानपरिषदेच्या 5 जागांसाठी 11 नावांची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये, लोकसभा निवडणूकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे. बीडमधील पराभूत उमेदवार पंकजा मुंडे, जालन्यातील पराभूत उमेदवार रावसाहेब दानवे आणि परभणीतील पराभूत उमेदवार महादेव जानकर यांच्या नावाची विधानपरिषदेच्या जागांसाठी चर्चा सुरू आहे.
दरम्यान नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने पंकजा मुंडे यांना बीडमधून लोकसभेच्या रिंगणात उतरवलं होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या बजरंग सोनावणे यांनी पंकजा मुंडे यांचा निसटता पराभव केला होता . मात्र आता त्यांना विधानपरिषदेच्या निवडणुकीत संधी मिळण्याची शक्यता आहे . गेल्या 5 वर्षांपासून राजकीय पुनर्वसनासाठी प्रयत्नशील असलेल्या पंकजा मुंडेंचा लवकरच विधिमंडळात सदस्य म्हणून समावेश केला जाऊ शकतो. तर, सातत्याने नाराजी दर्शवणाऱ्या पंकजा मुंडे समर्थकांना गुलाल उधण्याची संधी मिळू शकते.
विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. विधानसभा सदस्य विधानपरिषदेतील 11 आमदारांची निवड करणार आहेत. त्यासाठी, 25 जूनपासून 2 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. तर, 5 जुलै रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असणार आहे .तर 12 जुलै रोजी रोजी मतदान होणार असून 12 जुलै रोजीच निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळेविधानपरिषदेत कोणाची वर्णी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे .