मुंबई : लोकसभेची रणधुमाळी सुरु असताना आज कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) आणि हातकणंगलेचे उमेदवार धैर्यशील माने (Dhairyasheel Sambhajirao Mane) यांचा उमेदवारी अर्ज जोरदार अशा शक्तिप्रदर्शनानं दाखल करण्यात आला . दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीचे संजय मंडलिक यांनी शाहू महाराजांविरुद्ध 2 लाख 70 हजारापेक्षा जास्त लीडने जिंकणार असा विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला.
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्याविरोधात कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याचे वारसदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shrimant Shahu Chhatrapati Maharaj) हे निवडणूक लढवत आहेत. या पार्श्वभूमीवर आज महायुतीकडून कोल्हापुरात जोरदार असे शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महायुतीच्या दोन्ही उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. यासाठी आज सकाळी गांधी मैदान येथे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. शिंदे शिवसेना, अजित दादा राष्ट्रवादी काँग्रेस तसेच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनीही उपस्थिती लावली होती. तेथून वाद्याच्या गजरात मिरवणूक निघाली. शिवसेना पुन्हा सत्तेत हे नवे गीत जागोजागी वाजवले जात होते. उन्हाचा पारा तापलेला असतानाही गर्दी झाली होती. भगवे, निळे झेंडे फडकत होते. अशा जोरदार शक्ती प्रदर्शनाने महायुतीच्या उमेदवारांचा अर्ज भरण्यात आला . यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे काम घरोघरी पोहोचवा, त्यांची विकासाची दृष्टी अमाप आहे. महायुतीमध्ये एकजूट ठेवा , या निवडणुकीत पंतप्रधानांचे हात बळकट करण्यासाठी महायुतीच्या शिलेदारांना विजयी करा असे आवाहन उपस्थितीतांना केले . .
दरम्यान यावेळी बोलताना कोल्हापूर महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांनी म्हटले कि , हे काही शक्ती प्रदर्शन नाही, तर या ठिकाणी महायुतीची शक्ती आहे आणि ते नेते पाठिंबा देण्यासाठी येणार आहेत. त्यामुळे प्रचाराचे नियोजन केले जात असून गावोगावी तसेच घरोघरी कार्यकर्ते कसे पोहोचतील याचे नियोजन होणार आहे. त्याची सुरुवात केली असल्याचे मंडलिक यांनी स्पष्ट केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन लाख 70 हजारांनी विजयी झालो झालो होतो, असे सांगत कदाचित मी हे लीड ओलांडून विजयी होईल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. महायुतीच्या दोन्ही खासदारांना पुन्हा रिंगणात उतरवले आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर गेले पंधरा दिवस प्रचाराचा धुरळा उडला होता. सभा, मेळावे, पदयात्रा यांना जोर आला होता.आता या मतदारसंघात बाजी कोणाची लागणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळात शिगेला पोहचली आहे .