नवी दिल्ली
मोदी सरकारविरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीत फूट पडल्याचं वृत्त समोर आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी इंडिया आघाडीला धक्का दिला असून स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
काँग्रेसने तृणमूलचा प्रस्ताव मान्य न केल्याने हा निर्णय घेतल्याचं ममता बॅनर्जींचं म्हणणं आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि तृणमूलमध्ये जागावाटपावरुन वाद सुरू होते. मात्र दोन्ही पक्षांमध्ये एकमत झालं नाही आणि ममता बॅनर्जी यांनी स्वबळावर लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असं सांगितलं जात आहे.
पुढे त्या म्हणाल्या, पश्चिम बंगालमध्ये आम्ही एकट्याने निवडणूक लढवणार हे सुरुवातीपासून सांगत होतो. आमचा पक्ष धर्मनिरपेक्ष आहे आणि आम्ही स्वबळावर भाजपला हरवू शकतो, मी इंडिया आघाडीचा भाग आहे. राहूल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आमच्या राज्यातून जाणार आहे, मात्र आम्हाला याबाबत काहीच सांगण्यात आलं नाही, असंही त्या यावेळी म्हणाल्या.
नेमका कशावरून झाला वाद?
काही वृत्तांनुसार, काँग्रेसने १० ते १२ जागांची मागणी केली होती. मात्र तृणमूल काँग्रेसकडून केवळ दोन जागा दिल्या जात होत्या. काँग्रेसला हे मान्य नव्हतं. याशिवाय २०१९ च्या लोकसभेत काँग्रेस बहरामपूर आणि मालदा दक्षिण या दोन जागा जिंकली होती. या दोन जागांची टीएमसीकडून मागणी केली जात होती. पण काँग्रेस यासाठी तयार नव्हती.