मुंबई
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाविरोधात वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात मनोज जरांगेंना न्यायालयात हजर होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मनोज जरांगे पाटील पुण्यातून प्रवास करीत असून उद्यापर्यंत ते मुंबईच्या वेशीवर पोहोचू शकतात. यावेळी मुंबईतूनही मोठ्या संख्येने मराठा कार्यकर्ते मोर्चाच सहभागी होण्याची शक्यता आहे. आज गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर या याचिकेवरील सुनावणी पार पडली. राज्याचे महाधिवक्ता डॉ. रविंद्र सराफ देखील न्यायालयात उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. त्यांच्या मोर्चाला प्रतिबंध घालण्यात यावा, अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. जरांगे पाटलांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी सदावर्तेंची प्रमुख मागणी आहे.
मनोज जरांगेंना अद्याप परवानगी नाही..
मुंबईत मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानासह कुठेही आंदोलनाला परवानगी देण्यात आलेली नाही. आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांच्यासह ओबीसी नेत्यांनी आंदोलनासाठी अर्ज केला आहे. मात्र पोलिसांनी अद्याप कोणालाही परवानगी दिलेली नाही. जमाव एकत्र आला तर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो. मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरवाली सराटीतील लाठीचार्जमध्ये २९ पोलीस जखमी झाले होते, याचाही दाखल सदावर्ते यांनी कोर्टात दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील उद्या मुंबईत दाखल झाल्यानंतर कार्यकर्त्यांसह कुठे एकत्र येणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.
न्यायमूर्ती म्हणाले…
रोड ब्लॉक होणार नाही, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बिघडणार नाही याची सरकारने जबाबदारी घ्यावी. मनोज जरांगेंना उच्च न्यायालयात हजर होण्याबाबत नोटीस बजावा. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांना नोटीस बजावावी. आझाद मैदानात 5 हजार पेक्षा जास्त लोक येवू शकत नाही हे देखील कळवण्यात यावे.