राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या २०२१ च्या दौऱ्यानंतर अशा उपाययोजनांची पुनरावृत्ती? प्रशिक्षित श्वान पकड पथकाऐवजी पशुवैद्यकीय विभागावर जबाबदारी
महाड: छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड किल्ल्यावर सुरक्षेच्या कारणास्तव परिसरातील काही भटके श्वान आणि गुरे पकडून तात्पुरत्या पिंजऱ्यात ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या उपाययोजनेवर स्थानिक ग्रामस्थ आणि काही प्राणीप्रेमींनी प्रश्न उपस्थित करत प्रशासनाने अशा मोहिमेसाठी अधिक प्रशिक्षित यंत्रणा वापरण्याची गरज व्यक्त केली आहे.
स्थानिकांच्या माहितीनुसार, २०२१ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या रायगड दौऱ्यावेळी कडक सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून परिसरातील भटके श्वान आणि गुरे तात्पुरती बंदिस्त करण्यात आली होती. त्यानंतर आता शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यानही अशाच प्रकारची उपाययोजना करण्यात आल्याचे दिसून आले.
एका पिंजऱ्यात सात श्वान
मिळालेल्या छायाचित्रांनुसार एका पिंजऱ्यात तब्बल सात श्वान ठेवण्यात आले होते. पिण्याच्या पाण्यासाठी प्लास्टिकच्या कापलेल्या बाटल्यांचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. मात्र, त्यांच्या खाद्याची आणि पुरेशा जागेची व्यवस्था होती का, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.
प्रशिक्षित पथकाऐवजी पशुवैद्यकीय कर्मचाऱ्यांवर जबाबदारी
महानगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये भटके श्वान पकडण्यासाठी प्रशिक्षित कर्मचारी व विशेष उपकरणांचा वापर केला जातो. मात्र रायगड परिसरात ही जबाबदारी पशुसंवर्धन विभागातील पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर सोपविण्यात आल्याचे समोर आले आहे. अशा प्रकारच्या मोहिमेसाठी स्वतंत्र प्रशिक्षित पथकाची आवश्यकता असल्याचे मत स्थानिकांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांचा सवाल
स्थानिक ग्रामस्थांच्या मते, रायगड किल्ल्यावर दरवर्षी हजारो शिवभक्त आणि पर्यटक येतात. आतापर्यंतच्या इतिहासात भटके श्वान किंवा गुरांमुळे कोणतीही गंभीर सुरक्षा घटना घडल्याची नोंद नाही. त्यामुळे प्रत्येक मोठ्या कार्यक्रमावेळी प्राण्यांना पकडून बंदिस्त करण्याऐवजी त्यांच्या सुरक्षित व्यवस्थापनासाठी अधिक मानवी आणि शास्त्रीय पद्धती अवलंबण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
प्राणीप्रेमींमध्ये नाराजी
या प्रकारामुळे काही प्राणीप्रेमींनीही नाराजी व्यक्त केली आहे. त्यांच्या मते, सुरक्षेच्या उपाययोजना आवश्यक असल्या तरी त्या राबविताना प्राण्यांच्या आरोग्य, पाणी, अन्न आणि निवाऱ्याची योग्य व्यवस्था करणे तितकेच महत्त्वाचे आहे.
दरम्यान, काही छायाचित्रांमध्ये किल्ल्याच्या इतर भागात भटके श्वान मुक्तपणे फिरताना दिसत असल्याने ही मोहीम सर्वंकष होती की केवळ काही भागापुरती मर्यादित होती, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. याबाबत प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.

