X: @therajkaran
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर मतदारसंघात (Kolhapur Lok Sabha) छत्रपती शाहू महाराज(Shahu Maharaj) यांना गुरुवारी काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांचे आभार मानले. ते म्हणाले, राजकारणात न उतरण्याचा माझा वर्षाभरापूर्वी घेतलेला निर्णय मला बदलावा लागला. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटत नव्हती. पण आता जनतेला वाटत असेल की, आपण एका स्तरावर आलो आहोत, जिथे माझी आवश्यकता आहे. हीच वेळ आहे महाराजांनी लक्ष घालण्याची आहे, असे जनतेला वाटत असावे. त्यामुळे मी जनतेसाठी निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचे शाहू महाराजांनी सांगितले.
ते पुढे ते म्हणाले, आपल्या महाराष्ट्राला आणि कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. हा इतिहास छत्रपती शिवरायांपासून सुरु होतो. त्यांनी केलेले कार्य, त्या काळात त्यांनी समाजाला दिलेली दिशा, अन्यायाविरोधात त्यांचा लढा आणि सर्वसामान्य जनतेसाठी त्यांनी केलेले काम, या सगळ्याचा आदर्श आपल्यासमोर आहे. आधुनिक काळात शाहू महाराजांनी समता आणि शिक्षणाच्यादृष्टीने महत्त्वाचे कार्य केले. तोच विचार कोल्हापूरच्या जनतेमध्ये रुजला आहे. याशिवाय, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचासरणीचा प्रभाव आहे. हाच विचार पुढे नेण्याचं काम मी करणार आहे. सगळ्या समाजाला पुढे घेऊन जाणे हे आपले कर्तव्य आहे, असे यावेळी शाहू महाराज यांनी म्हटले. तसेच सध्याच्या काळात पुरोगामी लोकांनी एकत्र येण्याची गरज शाहू महाराजांनी व्यक्त केली.
कोल्हापूरची लढत ही व्यक्तिगत नसून ती वैचारिक आहे. हिंदुत्ववादी विरुद्ध पुरोगामी अशी ही लढत होणार असून, त्याचा संदेश राज्यभर जाणार आहे. म्हणूनच कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीवर राज्यासह देशाचे लक्ष राहणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसकडून उमेदवार म्हणून शाहू महाराज छत्रपती यांचे नाव निश्चित झाले आहे.