ताज्या बातम्या महाराष्ट्र

ठाण्यासह कोकणातील तीन जागेमुळे महायुतीत पेच

युतीची कोकण, ठाण्यात धक्कातंत्राची शक्यता

भाजप तीन, शिवसेना दोन व राष्ट्रवादी एक असा फॉर्म्युला

ठाणे कोकणात असणाऱ्या लोकसभेच्या सहा मतदारसंघातील, रत्नागिरी ,ठाणे व पालघर या तीन जागांमुळे भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीमध्ये पेच निर्माण झाला असून अंतिम जागावाटपात या मतदारसंघात धक्कादायक चित्र समोर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ठाणे , कल्याण, भिवंडी , पालघर , रायगड व रत्नागिरी असे सहा मतदारसंघ कोकण ठाणे पट्ट्यात येतात. अंतिम जागावाटपात कल्याण व भिवंडी हे मतदारसंघ अनुक्रमे डॉ श्रीकांत शिंदे व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटीलच लढवतील, तर विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून दबावाच्या राजकारणासाठी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी कितीही आगपाखड केली तरी रायगड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हेच महायुतीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झाले आहे. हमखास निवडून येणाऱ्या या तीनही मतदारसंघांची अदलाबदल करण्याचे राजकीय अपरिपक्वपण महायुती दाखवेल असे आत्ता तरी वाटत नाही.

रायगडमध्ये तटकरे यांच्याशिवाय शिवसेनेत किंवा अगदी भाजपमध्ये आणि भिवंडीत कपिल पाटील यांना वगळून शिवसेनेत किंवा भाजपामध्ये देखील निवडून येणारा उमेदवार नाही ही वस्तुस्थिती आहे. तर कल्याणमध्ये डॉ शिंदे यांना बदलणार नाही याची हमी भाजपाच्या शिर्षस्थ नेत्यांनी वेळोवेळी दिलेली आहे. त्यामुळे हे तीन ही मतदारसंघ भाजप , शिवसेना व राष्ट्रवादी असे प्रत्येकी एक एक लढवले जातील. वाद निर्माण झाला आहे तो उर्वरित रत्नागिरी , ठाणे आणि पालघर या तीन जागांचा.

रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ कायमच अनेक कारणांमुळे चर्चेत असतो. नारायण राणे कुटुंब हे विरोधकांना कायमच शिंगावर घेण्यात आघाडीवर असते. ज्या पक्षात ते असतात त्या पक्षाच्या विरोधकांना ठकासी असावे महाठक या न्यायाने जशास तसे उत्तर देऊन नामोहरम करण्यात या कुटुंबाचा हातखंडा आहे. या लोकसभा मतदारसंघात सावंतवाडीचे दीपक केसरकर व रत्नागिरीचे उदय सामंत, हे शिवसेनेचे , कणकवली चे नितेश राणे भाजप आणि चिपळूणचे शेखर निकम हे राष्ट्रवादी असे चार आमदार महायुतीचे आहेत. राजापूर राजन साळवी आणि कुडाळचे वैभव नाईक हे दोन आमदार शिउबाठा गटाचे आहेत.

चिपळूण , सावंतवाडी या मतदारसंघात विनायक राऊत यांच्याबद्दल सुप्त नाराजी पाहायला मिळते. कणकवली मतदारसंघात भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार आणि राणे यांचा समन्वय वाखाणण्याजोगा आहे. सावंतवाडीत केसरकर आमदार आहेत , त्यांचे आणि राणे कुटुंबियांचे सूर सध्या चांगलेच जुळले आहेत. रत्नागिरीत विनायक राऊत यांना कायमच सामंत बंधू यांनी तारलेले असायचे हे सर्वश्रुतच आहे. त्यामुळे या चारही मतदारसंघात विनायक राऊत यांनी मोठा फटका बसणार आहे. कुडाळचे वैभव नाईक विधानसभेपर्यंत उबाठा मध्ये टिकतील की नाही अशी शंका स्थानिक राजकारणात ऐकायला मिळते.

भाजपचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर नाईक नक्की काय करतील हे येणारा काळ सांगेलच. अशा परिस्थितीत राऊत यांना नाईकांची किती मदत होते हे सांगणे कठीण आहे. राजापूरच्या राजन साळवी यांच्यावरच राऊत यांची संपूर्ण मदार असेल. त्यामुळे शिउबाठा ला विनायक राऊत यांच्याशिवाय दुसरा पर्याय नसला तरी मतदारसंघातील नाराजी ते कितपत दूर करू शकतील हे महत्त्वाचे ठरणार आहे. या सर्व समिकरणांमुळेच या मतदारसंघात महायुतीला विजयाची खात्री आहे व त्यामुळे या जागेवर भाजप आणि शिवसेना या दोन्ही मित्रपक्षांनी आपला दावा ठोकला आहे. शिवसेनेने तर थेट उद्योग मंत्री सामंत यांचे बंधू किरण सामंत यांनाच उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली आहे. अब की बार चारसो पार यासाठी अर्थातच भाजपला एक एक जागा महत्त्वाची असल्याने भाजप हा धोका पत्करेल असे वाटत नाही. अगदीच शिवसेनेसाठी जागा सोडायची वेळ आलीच तर उदय सामंत यांनीच निवडणूक लढवावी असा स्पष्ट आदेश महायुतीतून सोडला जाईल. पण जर भाजपच या जागेवर लढणार असेल तर मात्र त्यांना अनेक गोष्टींचा विचार करून उमेदवार द्यावा लागणार आहे.

ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी राज्यसभा निवडणुकीपूर्वीच आपण निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे मोदी शाह आणि नड्डा यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी सल्लामसलत करून कळवले होते असे बोलले जात आहे. त्यामुळे जर हे खरं असेल तर लोकसभेला देखील ते स्वतः उमेदवारी मागतील अशी शक्यता वाटत नाही. अर्थात भाजप च्या दिल्लीतील श्रेष्ठींच्या मनात काय आहे हे कोणीच सांगू शकत नाही. घराणेशाही चे राजकारण याबाबत भाजप फारच काळजीपूर्वक आणि विचार करून पावले टाकत आला आहे.

स्वतः नारायण राणे, कणकवलीत विद्यमान आमदार नितेश राणे , आणि कुडाळ विधानसभेत डॉ निलेश राणे अशी एकाच घरात तीन तीन तिकिटे भाजप देईल ही शक्यता फार कमी वाटते. जर भाजपने हा मतदारसंघ लढवला आणि कुडाळ मधून विधानसभा लढण्या ऐवजी लोकसभा लढण्यास डॉ निलेश राणे तयार झाले तर मात्र भाजपचा पहिला प्रेफरन्स हा आक्रमक असणाऱ्या डॉ. निलेश राणे यांनाच असेल . भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद जठार हे देखील समन्वयाचे प्रबळ उमेदवार ठरू शकतात. त्यांचे आणि राणे कुटुंबियांचे संबंध मैत्रीपूर्ण आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण राणे कुटुंब तन मन आणि धनाने देखील रिंगणात उतरेल याची खात्री भाजप श्रेष्ठींना आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे नाव देखील या मतदारसंघात मध्येच कधीतरी ऐकायला येत असते ,अर्थात भाजपच्या दिल्ली श्रेष्ठींच्या धक्कातंत्रावर हे सगळे अवलंबून आहे.

पालघर मतदारसंघातील विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे २०१९ च्या निवडणुकीपुरताच शिवसेनेत आल्याने सध्या शिवसेनेत आहेत. खरंतर हा मतदारसंघ शिवसेनेचा नाहीच , परंपरेने येथे भाजपचं लढत आला आहे. २००९ मध्ये भाजपचे चिंतामण वनगा यांचा येथे निसटता पराभव झाला होता. मात्र त्याच वनगा यांचा २०१४ मध्ये तब्बल सव्वा दोन लाखांच्या मताधिक्याने विजय झाला होता. त्यांच्या दुर्दैवी निधनाने २०१८ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या मुलाला तिकीट नाकारून राजेंद्र गावित यांना उमेदवारी देत निवडून आणले. पण २०१९ मध्ये जागावाटपाचा कल शिवसेनेकडे गेल्याचे बघून गावितांनी भाजप सोडून शिवसेनेत उडी मारत उमेदवारी पटकावली व लोकसभा गाठली. परंपरागत मतदारसंघ म्हणून भाजपने पालघरची जागा मिळवली तर राजेंद्र गावित पुन्हा भाजप मध्ये यायला मागेपुढे पाहणार नाहीत आणि ईलेक्टोरल मेरिट म्हणून भाजप देखील गावितांना पक्षात घायला कचरणार नाही.

ठाणे मतदारसंघ हा मुख्यमंत्री शिंदे वास्तव्यास असलेला मतदारसंघ आहे. ठाकरे गटाचे राजन विचारे येथील विद्यमान खासदार आहेत. दबावतंत्र म्हणून गेले काही दिवस शिवसेनेने येथून आमदार रवींद्र फाटक यांचे नाव उमेदवार म्हणून पुढे दामटायला सुरुवात केली असून दावा ठोकला आहे. नरेश म्हस्के यांचे नाव देखील कधीतरी चर्चेत येत असते , मात्र त्यांना आमदारकीत जास्त रस आहे. याच तंत्राचा पुढील भाग म्हणून मुख्यमंत्री पुत्र डॉ श्रीकांत शिंदे यांना ठाण्यात उभे करून कल्याण भाजप साठी सोडायचा अशी थेअरी देखील मांडून झाली आहे. पण पालघर शिवसेने साठी सोडले तर त्या बदल्यात ठाण्यावर भाजपच हक्क सांगणार हे नक्की आहे , आणि भाजप मध्ये या जागेसाठी संजय केळकर , विनय सहस्त्रबुद्धे आणि संजीव नाईक असे तीन दावेदार आहेत.

आता मूळ कळीचा मुद्दा हाच आहे की , रत्नागिरी , ठाणे व पालघर या तीन जागांचा तिढा महायुती कुठला फॉर्म्युला वापरून सोडवणार ? अब की बार चार सौ पार यासाठी निवडून येण्याची क्षमता या एकमेव निकषांवर सध्या भाजप निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. या तीन जागांची अदलाबदल करायची झाल्यास रत्नागिरी मधील राणे सामंत यांचे मनोमिलन , येणाऱ्या विधानसभेत डॉ निलेश राणे व किरण सामंत यांच्या उमेदवारीची ऍडजस्टमेंट , वैभव नाईकांनी भाजपमध्ये उडी मारल्यास त्यांचे राजकीय पुनर्वसन याच बरोबर लोकसभेची जागा ज्याच्या वाटेला जाईल , त्यांच्याकडून हमखास निवडून येणारा व युतीमधील दुसऱ्या पक्षाला मानाने सांभाळून घेणारा उमेदवारच महायुतीला द्यावा लागणार आहे. ठाण्यात देखील जागा कोण लढवणार यावरच सर्व खेळ अवलंबून असेल , कारण या मतदारसंघातील सहापैकी तब्बल चार मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत , त्यामुळेच भाजपने ठाण्यावर स्वाभाविकपणे जोरदार हक्क सांगितला आहे.

पालघर मध्ये सध्या शिवसेनेचे खासदार आहेत. भाजपचा येथे याघडीला एकही आमदार नाही , शिवसेना ,राष्ट्रवादी व सीपीएम चा प्रत्येकी एक एक आमदार तर बहुजन विकास आघाडीचे तब्बल तीन आमदार या लोकसभा मतदारसंघात आहेत. लोकसभेच्या प्रत्येक निवडणुकीत बविआ अडीच ते तीन लाख मते मिळवते , २०१९ च्या निवडणुकीत तर बविआ च्या बळीराम जाधव यांनी ४९१५९६ एवढी घसघशीत मते पटकावली होती. त्यामुळे या मतदारसंघाचे गणितच वेगळे आहे. हा मतदारसंघ शिवसेनेला सोडायचा आणि ठाण्यावर आपला दावा भक्कम करायचा अशी स्ट्रेटेजी भाजप वापरणार असल्याचे समजते.

त्यामुळे पेच निर्माण झालेल्या , तीन जागांपैकी रत्नागिरी आणि ठाणे भाजपला , तर पालघर शिवसेनेला अशा निवडून येण्याच्या एकमेव निकषांवर या जागांचा तिढा सोडवला जाऊन , कोकण ठाण्यातील सहा जागांपैकी तीन भाजप , दोन शिवसेना आणि एक राष्ट्रवादी अशी सन्मानजनक अंतिम तडजोड होण्याचीच शक्यता जास्त आहे.

अजय निक्ते

अजय निक्ते

About Author

अजय निक्ते (Ajay Nikte) हे गेली २८ वर्षे मेनस्ट्रीम पत्रकारितेत कार्यरत आहेत. सामाजिक,सांस्कृतिक, कलाक्षेत्र ते गुन्हेगारी अशा विविध ठिकाणी त्यांची लेखणी लिहिती असली तरी , राजकीय पत्रकारिता हा त्यांचा आवडता विषय आहे. बातमी मागची बातमी आणि संबंधित विषयातील करंट अंडरकरंट्स अचूक हेरून ते लिखाणात उतरवणे ही त्यांची खासियत आहे. अजय उवाच या नावाने ते विविध विषयांवर ब्लॉगही लिहितात.यासह अभिनय ही त्यांची पॅशन असून ,अनेक मराठी ,हिंदी चित्रपट, सिरियल्स ,जाहिराती, शॉर्टफिल्म्स मध्ये त्यांनी अभिनयाचा ठसा उमटवला आहे. "मीडिया ,जर्नालिसम आणि ग्लॅमरवर्ल्ड" या विषयात, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी ते अनेक संस्थांमध्ये व्याख्यानं देतात.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात