सुरत
मुंबईतील डायमंड मार्केट सुरतला गेल्यानंतर मोठा राजकीय गदरोळ उठला होता. महाराष्ट्रातील उद्योग गुजरात जात असल्याने राज्य सरकारवर टीकाही केली जात होती. आता याच हिरे व्यापाऱ्यांनी आपला मोर्चा पुन्हा मुंबईकडे वळवल्याचं दिसत आहे.
गेल्या वर्षी १७ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमधील सुरत डायमंड बोर्सचे उद्घाटन केलं होतं. परंतू एकाच महिन्यात नेमकं असं काय घडलं की, हिरे व्यापारी पुन्हा मुंबईकडे रवाना होत आहेत.
सुरत डायमंड बोर्स उघडल्यानंतर सुरतदेखील मुंबईप्रमाणे हिरे व्यापाराचं केंद्र होईल, असा प्रयत्न केला जात होता. मात्र एकाच महिन्यात उपरती झाली असून या डायमंड बोर्सला मोठा धक्का बसताना दिसत आहे. सुरत शहर आणि बोर्स यांच्यातील अंतर व्यापाऱ्यांना सोईचं नसून या ठिकाणी सार्वजनिक वाहतुकीचाही अभाव आहे. याशिवाय कर्मचारी स्थलांतर करण्यात तयार नसल्यामुळे हिरे व्यापाऱ्यांची गाडी पुन्हा मुंबईकडे वळत असल्याचं सांगितलं जात आहे.
किरण जेम्सचे सर्वेसर्वा वल्लभभाई लखानी यांचा सूरत डायमंड बोर्स उभे करण्यात मोठा वाटा आहे मात्र, मुंबईतील इतर व्यापाऱ्यांकडून सहकार्य लाभ नसल्यामुळे लखानी आपला व्यवसाय पुन्हा मुंबईला हलवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे.