ताज्या बातम्या महाराष्ट्र मुंबई

‘महाराष्ट्रातील लढाई भाजपा विरुद्ध वंचित अशीच’, प्रकाश आबंडेकरांचं कार्यकर्त्यांना काय पत्र?

मुंबई- राज्यातील पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात १९ एप्रिलला मतदान होणार आहे. त्यापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबडेर यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलंय. कोणतीही चूक होऊ देऊ नका, असं कार्यकर्त्यांना सांगताना ही लढाई केवळ भाजपा विरुद्ध वंचित अशीच असल्याचं त्यांनी म्हटलय. महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तुकडे झालेले आहेत.काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, अशात केवळ वंचितच सक्षमपणे उभी असल्याचं त्यांनी म्हटलंय.

काय आहे प्रकाश आंबेडकरांचं पत्र?

वंचित बहुजन आघाडीच्या प्रिय कार्यकर्त्यांनो, तुमच्या बहुमोल पाठिंब्याबद्दल, अतूट निष्ठा व पक्षासाठी तुम्ही केलेल्या अखंडीत कामाबद्दल आभार मानण्यासाठी मी हे पत्र लिहित आहे.

येत्या शुक्रवारी, 19 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा – गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली-चिमूर येथील मतदार मतदान करून आपापले प्रतिनिधी निवडतील. या मतदार संघातील निवडणूक लढती फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी आणि भाजप यांच्यात आहेत.

आपल्याकडून कोणतीही चूक होऊ देऊ नका. महाराष्ट्रातील ही लढाई फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी व भाजप यांच्यात आहे.

शिवसेना आणि राष्ट्रवादीचे दोन तुकडे झाले आहेत. महाराष्ट्रात भाजप उमेदवार शोधण्यासाठी धडपडत आहे आणि महाराष्ट्रातील जागावाटपावरून मित्रपक्षांशी संघर्ष करत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि अनेक वरिष्ठ नेते त्यांच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात उघडपणे बंड करत आहेत. महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थिती पाहता फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी या लढाईमध्ये संपूर्ण ताकदीने लढण्यास सक्षम आहे. यामुळेच काँग्रेसलाही मतदारांमधील आमची लोकप्रियता कळते आणि म्हणून आम्हाला त्यांच्या दिल्लीत बसलेल्या हायकमांडने नागपुरातील त्यांच्या उमेदवारासाठी पाठिंबा देण्याची विनंती केली.

आपली वाढती शक्ती आणि महाराष्ट्रातील उलटसुलट राजकीय परिस्थितीने आपल्याला एक संधी दिली आहे, ती म्हणजे राज्यस्तरीय पक्ष बनण्याचे आपले स्वप्न साकार करण्याची. हे केवळ आपले स्वप्न् नाही, तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते, ते भैय्यासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते. मला माहिती आहे की, तुम्ही सर्वजण हे 70 वर्षांचे अपूर्ण स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाहीत.

माझी तुम्हाला आणखी एक विनंती आहे की, महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही पक्षांच्या पगारावर काम करणाऱ्या फेक न्यूज यंत्रणांनी पेरलेल्या खोट्या बातम्या वाचून आणि पाहून तुमचा संयम गमावू नका. त्याचा सत्याने सामना करा व तुमचा संयम गमावू नका. खरे तर त्यांना आपल्या पक्षाची आणि वाढत्या लोकप्रियतेची भीती वाटते या गोष्टीचा तुम्हाला आनंद व गर्व वाटला पाहिजे. आपण पराक्रमी नसतो, तर त्यांनी लुटलेला पैसा व वेळ आमच्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्यात खर्च केला असता का? नाही.

खोट्या बातम्या देऊन आपल्याला बदनाम करण्याचा त्यांचा प्रयत्न आपण किती सामर्थ्यवान झालो आहोत हे दर्शवते. वंचित बहुजन आघाडी त्यांची दुकाने बंद करेल याला ते घाबरत असल्याचे वास्तव आहे.

मीडिया आपल्यावर कुठल्याही प्रकारचे अफलातून आरोप लावेल. पण, तुमचा संयम गमावू नका. हे तेच माध्यम आहे जे मला हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना पाहिले तर त्यांची झोप उडते पण, महायुती व महाविकास आघाडीकडे असणाऱ्या व येणाऱ्या पैशांच्या स्त्रोतांवर प्रश्न विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे जो, एकाही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी का दिली नाही? असा प्रश्न या पक्षांना ते विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे, जो या पक्षांनी किती ओबीसी उमेदवारांना दिली? असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे जो, या पक्षांनी ओपन जागांवरून किती अनुसूचित जाती-जमातींना उमेदवारी दिली आहे? असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे जो, मला व आपल्या पक्षाला संसदेत जाण्यापासून रोखण्यासाठी या पक्षांनी इतक्या वर्षात कशा पद्धतीने एकत्र येऊन मिलीभगत केली? असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

हा तोच मीडिया आहे जो, अकोल्यात काँग्रेसने आरएसएसच्या स्वयंसेवकाला उमेदवारी का दिली? असा प्रश्न ते विचारणार नाहीत.

माध्यमांचा आपल्यासोबत भेदभाव नवीन नाही. जेव्हा तुम्ही त्यांचे भेदभावपूर्ण विश्लेषण पाहता किंमवा वाचता तेव्हा तुमचा संयम गमावू नका. त्यांना उत्तर देण्यासाठी संघटनेची शक्ती, सोशल मीडिया व सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मताचा वापर करा.

अजून एक शेवटची विनंती आहे की, तुम्ही प्रचारासाठी बाहेर पडाल तेव्हा पुरेशी काळजी घ्या. पाण्याची बाटली व सोबत दुपट्टा ठेवा. तुम्ही पक्षाचा सर्वात महत्वपूर्ण भाग आहात. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या.

ही लढाई आपण जिंकणारच. वंचित बहुजन आघाडीचा विजय असो.

प्रबळ प्रादेशिक पक्ष होण्याची इच्छा?

वंचितनं गेल्या लोकसभा निवडणुकीत ७ टक्के मतं मिळवलेली आहेत. याहीवेळी मविआत सामील न होता स्वतंत्र लढण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकरांनी घेतलाय. वंचितच्या उमेदवारांना चांगली मतं लोकसभेत मिळाली, तर विधानसभेत वंचितचं महत्त्व आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशात प्रबळ प्रादेशिक पक्ष अशी ओळख वंचितची निर्माण होऊ शकते. असं जाणकारांचं म्हणणंय.

Avatar

Rajkaran Bureau

About Author

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

You may also like

महाराष्ट्र ताज्या बातम्या मुंबई

सध्याच्या सरकारकडून लोकशाही मिटवण्याचं काम : जितेंद्र आव्हाड

Twitter : @therajkaran मुंबई स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी बलिदान दिल्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे. मात्र, आज स्वातंत्र्याचा 77 वा वर्धापन दिन साजरा
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीस : गडचिरोलीतील दुर्गम भागात पोहोचणारे पहिले गृहमंत्री

Twitter : @therajkaran मुंबई गडचिरोली हा महाराष्ट्राच्या एका टोकाला असलेला जिल्हा. छत्तीसगढ आणि तेलंगणा राज्याच्या सीमेला खेटून असलेल्या या जिल्ह्यात