मुंबई- उद्धव ठाकरेंनी आदित्य ठाकरेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत केलेल्या गौप्यस्फोटाचे तीव्र पडसाद राजकारणात उमटताना दिसतायेत. भाजपाकडून या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंवर टीकेचा भडीमार सुरु असताना आता ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीस यांचं पंतप्रधान होण्याचं मोठं स्वप्न आहे, त्यातूनच त्यांनी हे विधान केल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.
काय म्हणालेत संजय राऊत?
उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलं ते 100 टक्के सत्य असल्याचं संजय राऊत यांचं म्हणणं आहे. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात चांगले संबंध होते. चर्चा झाली त्यावेळी आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदी बसवून दिल्लीत जाणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं, असं राऊत म्हणालेत. दिल्लीत अर्थमंत्री आणि पंतप्रधान होण्याचं फडणवीस यांचं स्वप्न आहे. असंही राऊत यांनी सांगितलंय.
मोदी-शहांनी पंख छाटलेत- राऊत
राज्यातील कोणत्याही नेत्याला एवढी मोठी संधी मिळणार असेल, तर ठाकरेंची शिवसेना नक्कीच त्याच्या पाठीशी राहील. मात्र भाजपातच फडणवीस यांना विरोध झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहा यांना फडणवीसांचं हे स्वप्न आवडलं नाही. त्यांनीच फडणवीस यांचे पंख छाटले आणि त्यांना राज्यात उपमुख्यमंत्री केलं, असंही संजय राऊत यांनी सांगितलंय. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या ज्युनियर नेत्याच्या हाताखाली फड़णवीस यांना काम करावं लागत असल्याचा टोलाही राऊत यांनी लगावलाय.