नवी दिल्ली- महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिस्कटल्याचं दिसतंय. वंचितनं काँग्रेसच्या सात उमेदवारांना पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसनं फेटाळला का, अशी चर्चा सुरु झालीय. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत महाराष्ट्रात १८ ते १९ जागा लढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे. यातील १२ जागांवरच्या उमेदवारांची नावंही निश्चित करण्यात आल्याचं मानण्यात येतंय.
काँग्रेसचे संभाव्य उमेदवार
१. अकोलाः अभय पाटील
२. नांदेडः वसंतराव चव्हाण
३. लातूरः डॉ. कलगे
४. सोलापूर – प्रणिती शिंदे
५. गडचिरोली – नामदेव किरसान
६. कोल्हापूर – शाहू छत्रपती
७. अमरावती – बळवंत वानखेडे
८. पुणे – रवींद्र धंगेकर
९. चंद्रपूर – विजय वड्डेटीवार
१०. नंदुरबार – गोवाशा पाडवी
११. नागपूर – आ.विकास ठाकरे
१२. गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
या जागांबाबत निवडणूक समितीत चर्चा झाली असून अजून काही नावांवर विचार करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येतंय.
सांगली आणि मुंबईतील जागांचा तिढा कायम
सांगली लोकसभा मतदारसंघातून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्याचा आग्रह स्थानिक काँग्रेस नेत्यांकडून धरण्यात आलाय. त्यावर या बैठकीत चर्चा झाली नसल्याची माहिती आहे. त्याचबरोबर मुंबईतील मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर आणि मुंबी उत्तर मध्य या जागांबाबतही चर्चा झालेली दिसत नाहीये. या जागांचा विचार केल्यास काँग्रेस १९ पेक्षा जास्त जागा लढण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.
मविआची आज महत्त्वाची बैठक
काँग्रेसच्या या बैठकीनंतर महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक मुंबईत पार पडणार आहे. या बैठकीत मविआच्या जागांवर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सांगण्यात येतंय. या बैठकीला प्रकाश आंबेडकर यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. त्यामुळं वंचित स्वतंत्रपणे निवडणूक लढवेल अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.
हेही वाचाःभाजप कापणार वरुण गांधींचं तिकीट; अपक्ष लढण्याची तयारी?